मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! मासेमारी बंदी १६ दिवसांनी वाढण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादनवाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल. त्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल, असे सूतोवाच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केला आहे. या निर्णयाने ‘सिल्व्हर पापलेट’ सह इतर प्रमुख माशांच्या प्रजातींच्या उत्पादनवाढीवर सकारात्मक परिणाम होणार आहे
पालकमंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर प्रामुख्याने चर्चा झाली.
गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील बदलणारे हवामान, वाढती चक्रीवादळे आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांना समुद्रात जाणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरीकडे, जगभरातील अनेक प्रमुख सागरी देश तसेच शेजारील गुजरात राज्याने निसर्ग संवर्धन आणि मत्स्य उत्पादनवाढीसाठी ७६ दिवसांची बंदी यशस्वीरीत्या लागू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी ७६ दिवस (१ जून ते १५ ऑगस्ट) करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.