बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्यांनाही बांगलादेशात पाठवू ; मंत्री नितेश राणे

रत्नागिरी प्रतिनिधी,

बांगला देशी, रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगला देशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच, तर बांगला देशी नागरिकांसह आश्रय देणाऱ्यांनाही बांगला देशात पाठवून देऊ, असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बंदर, मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने मासेमारी संदर्भात जी नियमावली तयार केली आहे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास एलईडी मासेमारीसह परराज्यातील मच्छीमारांची आपल्या हद्दीत घुसण्याची हिंमत होणार नाही. आता मी मंत्री आहे, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. किनारपट्टीवरील बंदरांमध्ये कोणत्या अवैध कारवाया चालतात, याची माहिती आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी त्या कारवाया तत्काळ रोखाव्यात, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे बंदरे, मत्स्य व्यवसाय, पत्तन, कस्टम, पोलीस, महसूल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आढावा बैठकीनंतर ना. नितेश राणे यांनी आपल्या विभागाची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. मत्स्य उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.