ग्रामस्थांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा…

मालवण :

मालवण शहरातील धुरीवाडा येथील औदुंबर ते श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग हॉटेल पर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम होत नसल्याने श्रीकृष्ण सेवा मंडळ धुरीवाडा ग्रामस्थांनी सोमवारी मालवण नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न झाल्यास आम्ही उपोषणास बसू, असा इशारा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.धुरीवाडा येथील रस्ता खराब झाला असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्यापपर्यंत नगरपालिकेकडून या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. एप्रिल महिन्यात धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा वार्षिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे या कार्यक्रमापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धुरीवाडा गावाचीही बदनामी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी धुरीवाडा ग्रामस्थांनी केली. न.प.चे अधिकारी सुधाकर पाटकर यांनी सदर रस्त्याचे काम मंजूर असून निविदा प्रक्रिया झाली आहे, मात्र अद्याप ठेकेदाराशी करारनामा तसेच वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्याने हे काम सुरू करण्यात आलेले नाही असे सांगत करारनामा व वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.