माझी वसुंधरा ५.० अभियानात कुडाळ नगरपंचायतीचे यश

विभागात प्रथम तर राज्यात पटकावला दहावा क्रमांक
कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटात कुडाळने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्याच्या क्रमवारीत ६२ व्या स्थानावरून थेट १० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यशाबद्दल नगरपंचायतीला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

पंचतत्वावर आधारित कामगिरी : पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच तत्वांवर आधारित हे अभियान १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबवण्यात आले होते. यामध्ये राज्यातील एकूण ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून या निकालाचा अधिकृत शासन निर्णय प्राप्त झाला.


कुडाळ नगरपंचायतीने हे यश मिळवण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले, ज्यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होता


पर्यावरण संवर्धन : मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि शेवगा वाटप.
ऊर्जा बचत: सौर ऊर्जेचा वापर, सौर पथदिवे आणि ई-वाहनांचे प्रदर्शन.
प्रदूषण नियंत्रण: ई-चार्जिंग स्टेशनची उभारणी, सायकल ट्रॅकची निर्मिती आणि प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप.
स्वच्छता व पाणी: घनकचरा व्यवस्थापन, ‘बीज गोळे’ तयार करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ऑडिट आणि हवेची गुणवत्ता तपासणी.

नगराध्यक्षांनी या यशाचे श्रेय तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद नातू, वर्तमान मुख्याधिकारी विनायक औंधकर, सर्व नगरसेवक, कर्मचारी आणि कुडाळच्या नागरिकांना दिले आहे. तसेच व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, संत राऊळ महाराज महाविद्यालय, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील ‘२१ व्या शतकातील कुडाळ शहर’ घडवण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे. आगामी काळात पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांवर अधिक भर देऊन राज्याच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याचे ध्येय नगरपंचायतीने ठेवले आहे.


“गेल्या वर्षी आपण राज्यात ६२ व्या क्रमांकावर होतो, मात्र यंदा सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आपण १० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. सर्व कर्मचारी नगरसेवक व सीईओ यांचे सहकार्य. हे कुडाळकरांसाठी अभिमानास्पद आहे.” – नगराध्यक्ष, कुडाळ नगरपंचायत