मुंबई : ब्युरो न्यूज कोकणशाही
उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरु होताच चाकरमान्यांसह इतर प्रवाशांची गावी जाण्याची किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी लगबग सुरु होते. दोन तीन महिन्या आधीपासूनच चाकरमान्यांची तिकीट आरक्षणासाठी तिकीट काउंटरवर मोठी रांग लागते. यामुळे अनेकांच्या तिकीट बुकींग कन्फर्म होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जादा वाहतूक सोडण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत जादा वाहतूक सोडण्याचे आयोजन केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी मोठी गर्दी पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. तसेच या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गावी व फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते १५ जून,२०२५ पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस ची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून , त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प.महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.प.महामंडळाव्दारे करण्यात येत आहे, असे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.










