वैभववाडी ,
अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला द्या, या मागणीसाठी अरुणा धरणग्रस्तांनी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले आहे. जोपर्यंत पुनर्वसन गावठाणात कालव्याचे पाणी देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही कालव्याचे काम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे.कालव्याचे काम बंद पडताना अरुणा धरणग्रस्त.आखवणे – भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी द्या, अशी मागणी धरणग्रस्त धरणाच्या सुरुवातीपासून करीत आहेत. पुनर्वसन गावठाणा च्या दोन्हीही बाजूने कालवे जात आहेत. मात्र पुनर्वसन गावठाणाला कालव्याचे पाणी देण्यात आलेले नाही. पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत.मंगळवारी दुपारी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांनी डॉ.रंगनाथ नागप, आकाराम नागप जगन्नाथ जामदार यांच्या नेतृत्वाखाली मांगवली, तिरवडे, कुसूर येथे सुरू असलेले कालव्याचे काम बंद पाडले. अभय कांबळे, संजय नागप, सुरेश सुतार, अनंत मोरे, गणपत पडिलकर, वसंत नागप, शांताराम नागप, कृष्णा नागप यांच्यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त उपस्थित होते. काम बंद केल्याची माहिती मिळताच याबाबत मध्यम पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी पुनर्वसन गावठाणात येऊन धरणग्रस्तांची भेट घेतली. मात्र धरणग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कालव्याचे काम बुधवारी दुसऱ्या दिवशीही बंद होते.










