मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही
कोकण रेल्वे महामंडळाचा विकास, भविष्यातील प्रकल्प आणि निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. मात्र, कोकण रेल्वे हे नाव कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली होती. मात्र, आर्थिक विवंचना आणि निधीअभावी महामंडळाला भविष्यातील प्रकल्प राबवण्यात अडचणी येत होत्या. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेच्या विविध योजनांत भारतीय रेल्वे विभाग मोठ्या प्रमाणात निधी गुंतवू शकेल. विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव आणि स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाईल. यामुळे दुहेरी रेल्वेमार्ग निर्माण करणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण करणे आणि इतर महत्त्वाचे विकासकामे वेळेत पूर्ण करता येतील. यासंदर्भात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि केरळ या तिन्ही राज्यांनीही या प्रस्तावाला आपली संमती दिली असून लवकरच केंद्र सरकारकडे अंतिम प्रस्ताव कळवण्यात येणार आहे.










