आचरा
मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील दरम्यानच्या कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी यांनी पकडलेल्या होड्यांची पंचायादी घातली. पुढील कारवाई होईपर्यंत तोंडवळी पोलिस पाटील जगदीश मुळे यांच्या ताब्यात या होड्या देण्यात आल्या असून कारवाईसाठी अहवाल तहसीलदार मालवण यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आचरा- वायंगणी तलाठी मोसमी शिरसाठ यांनी दिली. होडी मालकांसह सर्व कामागारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. कालावलं खाडीपात्रात उपसाबंदी असलेल्या भागात रेवंडी येथील दोन होड्या वाळू उपसा करत असल्याचे ग्रामस्थांना समजताच तळशील ग्रामस्थांनी होड्यांच्या सहाय्याने जात वाळू उपसा करणाऱ्या दोन्ही होड्या पकडल्या. या दोन्हीही होड्यावर वाळू उपसा करण्याचे परवाने नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यात एक होडी वाळूने पूर्ण भरलेली तर दुसरी होडी अर्धवट भरलेली होती. या दोन्ही होड्यावर मिळून २८ परप्रांतीय कामगार वाळू काढण्याचे काम करत होते. ग्रामस्थांनी होड्या पकडल्याचे कळताच मालवणचे सहा. पोलिस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलिस पाटील जगदीश मुळे हे खाडीत हजर झाले होते. पकडलेल्या वाळूच्या होड्या जास्तवेळ पाण्यात ठेवणे धोक्याचे असल्याने पोलिसांनी ग्रामस्थ व कामगार यांच्याशी चर्चा करून होड्या किनारी हलवण्याच्या सूचना केल्या. यावेळी ग्रामस्थांनी आधी पंचयादी घाला मग होड्या हलवा, अशी भूमिका घेतली होती. यावर पोलिसांनी या होडीवर कारवाई करण्याचा अधिकार महसूल विभागाचा असल्याचे सांगत केवळ होड्यांच्या सुरक्षेसाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून होड्या किनारी हलवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या होड्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी व सहा बंदर निरीक्षक अनंत गोसावी उपस्थित झाले. यावेळी ग्रामस्थांचा जबाब नोंदविण्यात आला. महसूल प्रशासनाने दोन वाळू उपसा होड्या पकडल्या होड्यामध्ये ८ ब्रास वाळू असल्याचे पंचायदीत नमूद केले. दोन होड्यामधील वाळू व तसेच कामगार तसेच होडी मालकांची माहिती अहवाल मालवण तहसीलदारांना देऊन त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे तलाठ्यांनी सांगितले.
कालावल खाडीत वाळू उपश्यास बंदी असतानाही येथे राजरोस अनधिकृत वाळू
उत्खनन सुरू असते. या बाबत महसूल प्रशासनास वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, यामुळे अनधिकृत वाळू उत्खननात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून खाडी किनारी भागाची धूप होऊन किनाऱ्यावरील माड बागायतीचे नुकसान होत आहे. घरानांही धोका निर्माण झाला आहे. असे सांगत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.










