कुडाळ ; प्रतिनिधी
अदानी गो बॅक, फडणवीस सरकारचा निषेध असो, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे, महावितरणचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे, असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.मोर्चाची दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील स्मार्ट मीटरचे काम बंद राहील, असे लेखी पत्र महावितरण विभागाकडून मोर्चेकरांच्या हाती सुपूर्द केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.संबयावेळी अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्याकडे निवेदन देऊन स्मार्ट मीटर विरोधातील आपली लढाई सुरू राहणार असल्याची भूमिका माजी आ. वैभव नाईक व संपत देसाई यांनी मांडली.स्मार्ट मीटर विरोधात कुडाळ येथील महिला हॉस्पिटलसमोर मोर्चासाठी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संपत देसाई, माजी आ. वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाबुराव धुरी, सुनील शिंत्रे, संदेश पारकर आदींसह प्रमुख मंडळी व वीज ग्राहक एकत्रित झाले.










