सावंतवाडी : मळेवाड-आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे- शेटकरवाडी येथील रस्ता मागील अनेक महिन्यांपासून खचला असून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याची तळी व बागायतीला धोका निर्माण झाला असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसात रस्ता सुरळीत न झाल्यास रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुळ्दुवे सरपंच शैलेश जोशी यांनी दिला आहे.
मागील वर्षी जून २०२५ मध्ये येथील शेटकरवाडी परिसरात मुख्य रस्त्याचा एक भाग बाजूने खचला होता. याबाबत तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपात धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स लावून दिवाळीनंतर दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २०२६ उजाडले तरीही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही.
दरम्यान, सध्या हा रस्ता अधिकच खचत व कोसळत असून याठिकाणी दोन्ही बाजूंनी वळण असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन बांधकाम विभागाला देत तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. संभाव्य नुकसान व एखादी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा अपघात झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार असेल, असे सरपंच श्री. जोशी यांनी स्पष्ट केले.












