शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार का ? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार…

ब्युरो न्यूज कोकणशाही

राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती मधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. यातच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली आहे. मात्र, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं विधान केलं आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२८ मार्च) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आप आपले पीक कर्जाचे पैसे भरा”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.