अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम; फक्त १५ दिवसांत एसटीला ४३.८३ कोटींचा फायदा!

कणकवली : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे.
१ ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५, कोटी ३४ लाख रुपये इतके झाले असून मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४५१ कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के) वाढ नोंदविण्यात आली आहे. म्हणजे दररोज चे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले आहे. या कालावधीत रायगड (२ कोटी १७ लाख), पुणे (५ कोटी ९७ लाख), सातारा (३ कोटी ४६ लाख), छत्रपती संभाजीनगर (२ कोटी ६६ लाख), अमरावती (१ कोटी ६० लाख) नांदेड (२ कोटी २७ लाख) या विभागांनी सर्वाधिक उत्पन्नवाढ नोंदवली.
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर मोठा परिणाम होत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि एसटी प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ना. सरनाईक यांनी सांगितले.