सावंतवाडी : मळगाव ग्रामपंचायतीचा अधिकृत शिक्का गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप मळगाव येथील रहिवासी रामचंद्र देवळी यांनी केला आहे.
या भोंगळ कारभाराविरोधात त्यांनी सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. देवळी हे ग्रामपंचायतीत अर्ज देण्यासाठी गेले असता, शिक्का नसल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर १९ मे ला त्यांना केवळ सही करून पोहोच देण्यात आली, तर इतर अनेक नागरिकांना शिक्का नसल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. ग्रामपंचायतीचा शिक्का गहाळ होणे ही गंभीर बाब असून, कामात कसूर करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देवळी यांनी निवेदनातून केली आहे. या पत्राच्या प्रती सभापती आणि उपसभापती यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.












