पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १०) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करत असल्याने सध्याच्या परिस्थितीत संयम पाळणे ही ‘काळाची गरज’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोलियम उत्पादने केवळ आवश्यकतेनुसारच वापरावी लागतील
“आज पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांसारख्या गोष्टींचा अत्यंत संयमाने वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्याला आयात केलेली पेट्रोलियम उत्पादने केवळ आवश्यकतेनुसारच वापरावी लागतील. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रताही कमी होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी अक्षय आणि पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला. सौर ऊर्जा निर्मितीत भारत आज जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. तसेच, आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या मोहिमेत भारताने अभूतपूर्व प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या बहुआयामी ऊर्जा धोरणावर बोलताना मोदी म्हणाले की, सरकारने प्रथम प्रत्येक घरापर्यंत ‘एलपीजी’ (LPG) पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि आता स्वस्त ‘पाईप्ड गॅस’ (PNG) पुरवठा वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय, सीएनजी (CNG) आधारित इकोसिस्टमलाही केंद्र सरकार सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
तेलंगणातील प्रकल्पांचा शुभारंभ करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आज ‘रिफॉर्म्स एक्स्प्रेस’वर स्वार होऊन आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. यामध्ये हैदराबाद-पणजी इकॉनॉमिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर (NH-167) या मार्गाचे चौपदरीकरण. संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद औद्योगिक क्षेत्राचा विकास, काझीपेठ-विजयवाडा रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पाचे काही टप्पे आणि काझीपेठ रेल्वे बायपास. हैदराबादमधील ‘ग्रीनफील्ड पेट्रोलियम, ऑईल अँड ल्युब्रिकंट्स’ (POL) टर्मिनल आदींचा समोश असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुमारे १,७०० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेले वारंगल येथील ‘पीएम मित्रा पार्क’ (काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क) हे देशातील पहिले पूर्णतः कार्यान्वित पार्क आहे. केंद्र सरकारच्या ‘5F’ व्हिजन अंतर्गत हे पार्क कापड उद्योगाला बळकटी देण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.












